मुंबई – बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष सध्या काही केल्याने कमी होताना दिसत नाही.या संघर्षावर आता ठाकरे गटाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. सी ग्रेडमधून आलेले ए ग्रेडपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघात पेडणेकर यांनी यावेळी केला आहे.
“रवी राणा आणि नवनीत राणा यांची नौटंकी अवघ्या महाराष्ट्रात चालू आहे हे कायम सर्वांनी पाहिलंय. राजकारणात सी ग्रेडपासून वर आलेले ए ग्रेडपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत” असा टोला पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधत राणा दाम्पत्याला लगावला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी बच्चू कडूंचे कौतुक देखील केले.
रवी राणा यांनी बच्चूकडूंवर खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर कडू चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी राणा यांना १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देखील दिले होते. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी देखील बच्चू कडूंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. “बच्चू कडू हे चांगले आहेत ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा केला आहे. ज्यांच्याबरोबर अनेक आमदार आहेत. त्यांच्याबाबत हे नौटंकी दाम्पत्य अस काही करत असेल तर त्यांना त्रास होणारच” अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे.