मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यलायावर केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई ही राज्य सरकारने सूडाच्या भावनेतून केल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढलेला असताना, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतप्त झाल्या आहेत. थेट न्यायालयाच्या निर्णयावर घटनात्मक महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला टीका करता येत नसल्याने, आपल्या संतापाला त्यांनी ट्वीटरद्वारे वाट करुन देत कंगना राणावतचा उल्लेख “दो टके के लोग’ असा केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर, कंगना राणावतने न्यायालयाचे आभार मानत, हा आपला व्यक्तिगत विजय नसून, लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH: Everyone is surprised that an actress who lives in Himachal, comes here & calls our Mumbai PoK… such ‘do takke ke log’ want to make Courts arena for political rivalry, it’s wrong: Mumbai Mayor Kishori Pednekar on Bombay HC setting aside BMC notices to Kangana Ranaut https://t.co/DZi7GVeFI2 pic.twitter.com/UPlLvygIxI
— ANI (@ANI) November 27, 2020
आपल्या ट्वीट संदेशात पेडणेकर म्हणतात की, हिमाचल प्रदेशातून महाराष्ट्राच्या राजधानीत पोट भरायला आलेल्या कंगना राणावतसारख्या “दो टके के’ लोक न्यायालयांचा वापर आखाड्यासारखा करत असून स्वत:ची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी आता उच्च न्यायालयांनाही सोडलेले नाही.
कंगना राणावतची राज्य सरकारवर जळजळीत टीका
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीची तुलना “पाकव्याप्त काश्मीर’शी करणाऱ्या कंगनासारख्या मुली नक्की काय साध्य करु इच्छित आहेत, हे समजत नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे चुकीचे असल्याबद्दल न्यायालयाने कंगनाचे कान उपटले आहेत, याकडे पेडणेकर यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
एकूणच, कंगनाचे ऑफिस तोडण्याचे प्रकरण अंगलट आल्यानंतर आता महापालिकेला तिचे ऑफिस पूर्ववत करुन द्यावे लागणार असून, मोठी नुकसानभरपाईही द्यावी लागणार असल्याने, मुंबई महापालिका, राज्य सरकार, मुंबई पोलिस आणि या कृत्याला समर्थन देणाऱ्या पेडणेकर यांचे नाक चांगलेच कापले गेले आहे.