कोलकाता – संयुक्त किसान मोर्चा या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त संघटनेने पश्चिम बंगाल मधील मतदारांना भारतीय जनता पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे अंमलात आणणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी येथील मतदारांनी भाजपला पराभूत करावे असे आवाहन या नेत्यांनी केले आहे.
या संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आमचा कोणत्याहीं विशिष्ट राजकीय पक्षाला पाठिंबा नाही. पण भाजपला पराभूत करा असे एकच आमचे सांगणे आहे. तुम्ही कोणालाही मतदान करा पण भाजपला धडा शिकवा अशी आमची पश्चिम बंगाल मधील मतदारांना विनंती आहे असे ते म्हणाले. या मोर्चाने पश्चिम बंगाल राज्यातील शेतकऱ्यांना उद्देशूनही एक आवाहन पत्र जारी केले असून त्यात त्यांनी भाजपला पराभूत करण्याची सुचना केली आहे. निवडणुकांमध्ये पराभव झाला तरच भाजप हे तीन काळे कायदे मागे घेईल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही यावेळी मतदारांना अत्यंत काळजीपुर्वक मतदान करण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने देश विकायला काढला आहे. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठीच आता मतदान व्हायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल सरकारने या कृषी कायद्यांना विरोध करणारा कायदा राज्यात केला त्याबद्दल मेधा पाटकर यांनी त्या सरकारचे अभिनंदनही केले आहे.