मथुरा – राजस्थानातील सनसनाटी पोलीस चकमकीत 35 वर्षांपूर्वी भरतपूर संस्थांनचे तत्कालीन प्रमुख राजे राजा मानसिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा निकाल आज मथुराच्या स्थानिक न्यायालयाने दिला आणि कोर्टाने यातील 11 आरोपींना दोषी ठरवले. हे अकरा जण राजस्थान पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. त्यांना उद्या बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
21 फेब्रुवारी 1985 साली ही हत्या झाली होती. त्याची गेली 35 वर्षे सुनावणी सुरू होती. कोर्टाच्या एकूण सुमारे 1700 सुनावण्या या संबंधात झाल्या. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, 1985 साली राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत दिग मतदारसंघात कॉंग्रेसने निवृत्त आयएएस अधिकारी ब्रिजेंद्रसिंह यांना कॉंग्रेसने राजा मानसिंग यांच्या विरोधात उमेदवारी दिली होतीे.
त्यावेळी एका प्रचाराच्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भरतपूर संस्थांनच्या ध्वजाचा अवमान करणारी घटना घडली होती. त्यामुळे राजा मानसिंग संतापले होते. त्या मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांची सभा होणार होती. राजा मानसिंग हे जीपमधून सभेच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जीप त्या सभेच्या व्यासपीठाला धुडकावून ते त्यांनी मोडून टाकले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचीही त्यांनी मोडतोड केली. हा प्रकार 20 फेब्रुवारी 1985 रोजी घडला.
पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचे नातू दुष्यंतसिंह यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मानसिंह हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात शरण येण्यासाठी गेले असताना तेथे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात मानसिंह हे ठार झाले. पोलीस उपअधीक्षक कानसिंग भाटी हे यातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानेच त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात मानसिंह आणि त्यांचे दोन साथीदारही मारले गेले.
28 फेब्रुवारीला या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आला आणि नंतर या प्रकरणाची सुनावणी मथुरेच्या कोर्टात स्थलांतरित करण्यात आली. आज कोर्टाने ज्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले आहे त्यात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कानसिंग भाटी यांचाही समावेश आहे. या हत्या प्रकरणात कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथूर यांना राजीनामा द्यावा लागला होता.