उत्तर कोरियात अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई
प्योंग्यांग : उत्तर कोरियामध्ये अन्नधान्य टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचा हुकूमशहा किम जोंग याने अतिशय विचित्र असा आदेश जारी केला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी देशातील नागरिकांनी 2025 पर्यंत नेहमीपेक्षा कमी आहार ठेवावा असा तुघलकी सल्ला किमने आपल्या नागरिकांना दिला आहे.
एकीकडे उत्तर कोरियामध्ये अन्नधान्याची टंचाई जाणवत असतानाच अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्य पुरेसे उपलब्ध होत नसताना जे काही अन्नधान्य उपलब्ध होत आहे ते भारी किमतीला लोकांना खरेदी करावं लागत आहे. या अभूतपूर्व समस्येबाबत चर्चा करताना किंमने ही समस्या का निर्माण झाली. याची विविध कारणे समोर मांडली असली तरी त्याने या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
देशातील कृषी क्षेत्राने योग्य प्रमाणात आणि पुरेशा प्रमाणात कृषी उत्पादन केले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. 2025 पर्यंत कोरियातील हे संकट असेच कायम राहण्याचे संकेत असल्याने या कालावधीपर्यंत लोकांनी अन्नधान्याचा वापर जपून करावा आणि त्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे असा हा किम जोंग चा सल्ला आहे. 2025 नंतर चीन आणि उत्तर कोरिया यांच्यातील व्यापार पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने तेव्हा हे अन्नधान्याचे संकट समाप्त होईल अशी अशा किमला वाटत आहे.
आगामी कालावधीमध्ये शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी नवनवीन उपाययोजना कराव्यात असा सल्लाही किमने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. उत्तर कोरियातील शेतीचा आगामी हंगाम संपेपर्यंत देशातील अन्नधान्य टंचाईचे आणि महागाईचे संकट अधिकच तीव्र होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.