बेंगळुरु : कर्नाटकातील म्हैसूरच्या रस्त्यावरून या महिन्याच्या अखेरपर्यंत खास दिव्यांगांसाठी रचना केलेल्या ई-रिक्षा धावताना दिसू लागतील. बेंगळुरु येथेली किकस्टार्ट सर्व्हिसेस या स्टार्टअप कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या या रिक्षा विकसित केल्या आहेत.
कंपनीचे संस्थापक श्रीक्रिश शिवा आणि विद्या रामसुब्बन हे म्हैसूरमध्ये 2014 पासून दिव्यांगांसाठी कॅब सेवा पुरवतात. याबाबत शिवा म्हणतात, आम्ही दिव्यांगासाठी वाहतुकीची सेवा पुरवत असलो तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत मोडणाऱ्या दिव्यांगांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना परवडेल अशी सेवा आपण देऊ शकत नाही, याची खंत वाटत होती. त्यातूनच ई-रिक्षा विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला.
विद्या रामसुब्बन यांनी अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांसाठी काम केलेले आहे. त्या म्हणतात, भारतात दिव्यांगाची संख्या सुमारे तीन कोटी एवढी आहे. त्यांना वापरण्यासाठी सोयीच्या अशा वाहनांची संख्या फक्त 100 आहे. पुन्हा दिव्यांगासाठी सोयीच्या असणारी कारसेवा सर्वसामान्य वर्गातील लोकांना परवडत नाही. दिव्यांगांपैकी जेमतेम 15 टक्के नागरिकच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू शकतात. त्याउलट विकसित देशांमध्ये दिव्यांगांचा विचार करून सुविधा तयार करण्यात आल्यामुळे तिथे 65 टक्के दिव्यांग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात.
या सगळ्यांचा विचार करून दिव्यांगांना वापरता येतील आणि त्यांच्यासाठी सहजपणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतील यादृष्टीने ई-रिक्षा विकसित करण्यात आली आहे. ती मागीला बाजूने उघडते आणि रिक्षाला जोडलेला रॅम्प रस्त्याला टेकतो. जेणेकरून व्हीलचेअरमधील दिव्यांग व्यक्तीला चेअरसह रिक्षात शिरता यावे. या रिक्षाला ‘किकस्टार्ट गती’ असे नाव देण्यात आले असून त्यामध्ये दोन प्रवाशांना बसता येते.
एकदा चार्ज केल्यावर ही रिक्षा 80 किलोमीटर धावू शकते. रिक्षा चालवण्यासाठी किलोमीटर जेमतेम एक रुपया खर्च येतो. नेहमीच्या रिक्षापेक्षाही कमी दरात दिव्यांगांना रिक्षासेवा मिळावी असा आमचा प्रयत्न असल्याचे रामसुब्बन यांचे म्हणणे आहे.
या रिक्षात व्हीलचेअर बांधण्यासाठी बेल्टसारख्या सुरक्षा उपायांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने या रिक्षांना परवानगी दिली असून पथदर्शक प्रकल्प म्हणून म्हैसूरमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही रिक्षासेवा चालवली जाणार आहे.
म्हैसूरनंतर हुबळीमध्ये ही सेवा सुरु होणार आहे. त्यानंतर या ई-रिक्षांची भारतभर विक्री करण्याचा कंपनीचा विचार आहे. जेव्हा रिक्षात दिव्यांग व्यक्ती नसेल तेव्हा ही रिक्षा सर्वसामान्य प्रवाशांनाही वापरता येते.