रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यात अलसुरे येथील एका कोरोनाबाधित रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे. मागील महिन्यात दुबईहून परत आलेल्या या रूग्णाला सोमवारी खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दाखल करतानाच प्रकृती खालावलेली असलेल्या या रूग्णाचा अखेर मृत्यू झाला.
मूळचा अलसुरे येथील ५० वर्षे वयाचा हा व्यक्ती १७ मार्च रोजी दुबईहून मुंबईमार्गे आपल्या गावी परत होता. त्यानंतर थोड्या दिवसात त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याने स्थानिक डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले. अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवले. त्यांना या रूग्णाची लक्षणे गंभीर वाटल्याने लगेच सरकारी रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सोमवारी त्यांना कळंबणी येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे बुधवारी निधन झाले.
दरम्यान या घटनेनंतर अलसुरे गाव सील करण्यात आले असून संबंधित रूग्णाने गावी परत आल्यानंतर कोणाकोणाच्या गाठी-भेटी घेतल्या, याबाबतची माहिती प्रशासनाकडून गोळा केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ४ रूग्णांचे अहवाल करोनाबाधित असल्याचे आले आहेत. त्यापैकी दोघेजण मागील महिन्यात दुबईहून आलेले आहेत, तर अन्य दोघेजण निजामुद्दीन येथे मागील महिन्यात आयोजित ‘तबलिगी जमाती’च्या कार्यक्रमाला जाऊन आलेले आहेत. यापैकी एका रूग्णास तो पूर्णपणे बरा झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे.