राजगुरूनगर -खेड पोलीस ठाण्याअंतर्गत विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून आतापर्यंत सुमारे 10 लाखांचा दंड वसल करण्यात आला आहे, अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
मागील 20 दिवसांपासून ठिकठिकाणी पोलिसांची कारवाई सुरू आहे. यात 2534 व्यक्तींकडून 9 लाख 46 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे 2077 व्यक्तींवर न्यायालयात खटले भरले आहेत. खेड न्यायालयात खटले प्रकिया सुरु असून जाब देणाऱ्या न्यायालयाकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जात आहे.
आता पर्यंत 30 खटल्यांचा निकाल न्यायालयाने दिला असून 30 हजारांची वसुली झाली आहे. शनिवारी (दि. 19) व रविवारी (दि. 20) तालुक्यात “घर टू घर’ करोना सर्वेक्षण असल्याने ही कारवाई आणखी कडक ठेवण्यात येणार आहे.
या ठिकाणी कारवाई..
पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर, धनश्री चौकात वाडा रस्त्यावर आणि तालुक्यातील बाजाराच्या गावांमध्ये पोलिसांची ही कारवाई सुरु आहे. यावेळी सतीश गुरव यांच्यासह सहायक निरीक्षक निलेश बडाख, राहुल लाड, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार राजेश नलावडे, शेखर भोईर आदी पोलीस सहभागी झाले होते.