शिवसैनिकांनी तहसीलदार, बीडीओ, आरोग्य अधिकाऱ्यांना धरले धारेवर : उपाययोजना राबवण्याची निवेदनाद्वारे मागणी
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात करोनाबाधितांची आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यात तालुका प्रशासन कमी पडले आहे. तरी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने केली आहे. याबाबत तहसीलदार सुचित्रा आमले यांची भेट घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे
निवेदन दिले.
ज्या गावात, भागात बाधित आहेत. त्याठिकाणी नागरिकांची 100 टक्के तपासणी करावी. बाधितांना क्वारंटाइन करावे. हॉस्पिटलमधील यंत्रणेवर शासकीय नियंत्रण राहिले नाही. गावांत शेवटच्या घटकापर्यंत शासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीला दाखल करून घेतले जात नसल्याने संसर्ग वाढत आहे. याबाबत शिवसैनिकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, महिला संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्या रुपाली जाधव, तालुका प्रमुख रामदास धनवटे, महिला प्रमुख नंदा कड, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, उपतालुका प्रमुख संजय घनवट, एल. बी. तनपुरे, किरण गवारे, महेंद्र घोलप, बाबा इनामदार, दिलीप तापकीर, सुनील टाकळकर शिवसैनिक उपस्थित होते.
संजय घनवट म्हणाले, चार-चार दिवस स्वॅब घेतले जात नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगीमध्ये दुसऱ्या दिवशीच स्वॅब अहवाल येतात. जादा दिवस लागल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. सरकारी डॉक्टर, खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठवतात. त्यामुळे रुग्णांना जादा पैसे मोजावे लागतात. सरकारी दवाखान्यात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार व्हावेत. खासगी दवाखान्याकडून होणारी लूट थांबवावी, असे त्यांनी नमूद केले. रामदास धनवटे म्हणाले, प्रशासनाकडून चांगले नियोजन करून करोनासंसर्ग आटोक्यात आणावा, त्यासाठी नियोजन बद्ध प्लॅनिंग कराव, असे त्यांनी
नमूद केले.
स्वॅब घेण्यातही सुरुवातीला उद्दिष्ट दिल्याने स्वॅब तपासणी कमी झाली आणि रुग्ण जास्त होते, त्यामुळे रुग्ण संख्या वाढली. गावपातळीवर प्रशासन कमी पडले असले तरी यापुढे प्रशासनाकडून प्रभावी यंत्रणा आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.
– सुचित्रा आमले, तहसीलदारल
मध्यंतरी रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे स्वॅब अहवाल वेळेत आले नाहीत. आता रुग्ण संख्या कमी होत चालली असून सुविधांबाबत अधिक सुधारणा केल्या जातील. खासगी रुग्णालयात 80 टक्के खाटा शासनाने राखीव केल्या आहेत. तालुक्यातील खासगी रुग्णालयांना भेटी दिल्यानंतर सरकारी खाटा व दाखल रुग्णांना डिस्चार्जबाबत माहिती डिस्प्ले केली जात आहे.
– डॉ. बळीराम गाढवे, आरोग्य अधिकारी, खेड तालुका