राजगुरुनगर (रामचंद्र सोनवणे,प्रतिनिधी) : वांजळे (ता. खेड) येथे अरुंद पुलावर समोरून आलेल्या भरधाव वेगातील कारला वाचवताना एसटीबसला अपघात झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. बस पुलाच्या कठड्यावर अडकल्याने मोठा अपघात टळला. सुदैवाने एसटी बस मधील कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत स्थानिक नागरिकांनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, राजगुरूनगर आगाराची घोटवडी- राजगुरूनगर बस क्रमांक एमएच 07 सी 7283 घोटवडीकडून राजगुरुनगर कडे येत असताना वांजळे येथील पुलावर आली असता समोरून भोरगिरी-भीमाशंकर कडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारला वाचविताना एसटी बस पुलाच्या कठड्यावर गेली. चालकाच्या प्रसंगावधानाने बस नियंत्रणात ठेवल्याने कठड्याला अडकली त्यामुळे मोठा अपघात टळला. सुदैवाने बस मधील कोणीही जखमी झाले नाही.
शिरूर-राजगुरुनगर- भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गावरील वांजळे आणि वाळद येथे अरुंद पूल आहेत. या मार्गावरून भीमाशंकर भोरगिरी परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची, भाविक, भक्तांची संख्या मोठी आहे. सलग सुट्ट्या आल्याने या महामार्गावरून भीमशंकर कडे मोठ्या संख्येने भाविक वर्ग ये-जा करीत आहे. या रस्त्यावरून जाताना वांजळे, वाळद येथील अरुंद पुलाचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. त्यामुळे भरधाव आलेल्या वेगात त्यांचा गाड्यांवरचा ताबा सुटून अपघात झाले आहेत. दुचाकी चालकानाचे सर्वाधिक अपघात येथील अरुंद पुलावर होत आहेत. आज सुट्टी आणि रक्षा बंधनं असल्याने ये रस्त्यावर व्हॅनची मोठी गर्दी होती.
वांजळे (ता. खेड) येथे गुरुवारी (दि.11) दुपारी साडेतीन च्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कार वाचविताना एसटी बसचा अपघात झाला. बसचे पुढचे चाक कठड्यावरून खाली उतरले बस चालकाला धोका माहिती असल्याने त्याने गाडीचा वेग कमी नेल्याने व बसवर नियंत्रण मिळवल्याने बस पुलावर तरंगत राहिली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस मधील प्रवाश्यांचा जीव वाचवल्याबद्ल परिसरातील नागरिकांनी बस चालकाचे अभिनंदन केले.