नवी दिल्ली – देशातील काही अपवाद वगळता बहुतांश भागात चांगल्या पर्जन्यमानामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढले आहे.
प्राप्त माहितीनुसार 24 जुलैपर्यंत खरिपाच्या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी 24 जुलैपर्यंत 800 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 675 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. खरिपात तांदूळ, डाळी, धान्य, तेलबिया इत्यादी पीके घेतली जातात. आतापर्यंत 220 लाख हेक्टरवर तांदूळ लावला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 187 हेक्टरवर तांदूळ लावला होता. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार छत्तीसगढ, पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली.
डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रातही 25 टक्क्यांची वाढ होऊन 100 लाख हेक्टरवर डाळींचे पीक घेतले जात आहे. करोना व्हायरसचा ग्रामीण भागावर कमी परिणाम झाला आहे. त्यातच या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे पीक पाणी चांगले होऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.