प्रशासनाकडून पंचनामे सुरू
निमसाखर – निमसाखर (ता. इंदापूर) परिसरात खरीप हंगामातील विविध पिके सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे निमसाखर परिसरात पिकांचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू केले आहेत.
निमसाखर परिसरातील शेतकऱ्यांनी अल्प ओलीवर धाडस करत खरीप हंगामातील पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या.
यामध्ये बाजरी, मूग, चवळी, उडीद, मका, कडवळ, सूर्यफूल यासह अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाला होता. मात्र ऑगस्टअखेर सुरू झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले होते व ते चांगले तरारले ही होते. तर आता यातील काही पिके काढणीवर आले असतानाच परतीच्या पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.
परतीच्या पावसाच्या थैमानामुळे बाजरीच्या कणसांलाच मोड आले असून अनेक शेतांमध्ये अद्यापही पाणी साचलेले असल्याने पिकांची मुळे कुजली आहेत. याचबरोबर डाळिंब, केळी, पेरू, चिक्कू, आंबा यासह अन्य फळबागांमध्येही या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश आल्याने कृषी सहायक देवडे, ग्रामसेवक सुधाकर भिलारे, तलाठी खारतोडे यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पंचनामे केले जात आहे.