मुंबई – मागील काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विविध विषय हाताळले जात आहेत, अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना सध्या सुगीचा काळ आहे अस म्हटल तर वावग ठरणार नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफीसवर त्याच वेळी इतर चार चित्रपटांची टक्कर असतानाही ‘हिरकणी’चा शो हाऊसफुल होता. त्यानंतर आता संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, आधी प्रदर्शित झालेल्या मोठ्या मल्टीस्टारर चित्रपटांना मागे टाकत ‘खारी बिस्कीट’ने चित्रपटाला सर्वत्र हाऊसफुल्लचा बोर्ड झळकताना पहायला मिळत आहे. ‘खारी बिस्कीट’ची गाणी, ट्रेलर आणि टीझर सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होते. ‘लाडाची गं’ आणि ‘तुला जपणार आहे’ ह्या गाण्यांनी तर टिक-टॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
या चित्रपटाला ओपनिंगलाच तीनशेहून जास्त चित्रपटगृहांची मागणी होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता पहिल्या दोनच दिवसांत चित्रपटाच्या शोजच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.