मुंबई – 16 एप्रिल रोजी यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक अनुयायी नवी मुंबईतील खारघरमध्ये आले होते. मात्र हा सोहळा रणरणत्या उन्हात घेण्यात आला होता. यामुळे उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्याचे दिसून आले.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या अनुयायांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, आता या घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. तर या आकड्यावरूनही अनेकांनी शंका व्यक्त केली. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी राज्य सरकारने एकल सदस्यीय समिती देखील स्थापन केली होती.
दरम्यान, अद्याप देखील खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या एकल सदस्यीय समितीने अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील समितीने आता अहवालासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि महिनाभरात अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती.
मात्र आता या समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत मागितली आहे. त्यामुळे खारघर प्रकरणावर दाखल जनहित याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे. मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी म्हणजेच, 8 जूनला होणार आहे.