गांधी घराण्याबाहेरील उमेदवारांमध्ये ‘काटे की टक्कर’
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा निवडणूक लढवली जात आहे. यासाठी सोमवारी, उद्या मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापैकी एकही गांधी घराण्यातील उमेदवार नाही. यामुळे 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसचा अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.
कॉंग्रेस कमिटीचे सुमारे 9 हजारहून अधिक मतदार असल्याने व मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे दोन्हीही उमेदवार विविध राज्यांचा दौरा करत आहेत. या पदासाठी खर्गे यांनाच पहिली पसंदी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांनाच पाठिंबा देत आहेत. खर्गे यांना पाठिंबा मिळत असला तरी थरूर यांनी मात्र पक्षांतर्गत बदलावर जोर दिला आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, कॉंग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी ही सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत आहेत. प्रसारमाध्यमांनी 1939, 1950, 1997 आणि 2000 चा उल्लेख केला आहे. पण निवडणुकाही 1977 मध्ये झाल्या होत्या आणि त्यावेळी कासू ब्रह्मानंद रेड्डी हे निवडून आले होते.
कॉंग्रेस पक्षात या अंतर्गत निवडणुका पक्षाला मजबूत करतात. मात्र त्याचवेळी वैयक्तिक हेतू आणि हेवेदावेही उफाळून येतात. त्यामुळे समूहाच्या आणि गटातटाच्या राजकारणमुळे मात्र अशा पक्षीय निवडणुकांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.