शंकर ढेबे
वेल्हे (पुणे) – पुण्यापासून 70 कि. मी. अंतरावर असणाऱ्या वेल्हे तालुक्यातील खानू हे गाव निसर्गाची खाणच आहे. येथे निसर्गाने हिरवागार शालू पांघरलेला दूरपर्यंत पाहायला मिळतो. त्यावर धुक्याची पांढरी शुभ्र चादर पसरलेली आहे.
उंच डोंगरावर वसलेल्या खानू गावाची लोकसंख्या जेमतेम 100 ते 150 घरात आहे. या डोंगरावरच्या खानू गावाकडे मुख्य रस्त्यापासून पुढे 5 कि. मी. कच्चा मातीचा रस्ता गेला आहे. लाल मातीचा हा रस्ता आणि आजूबाजूला हिरवेगार घनदाट जंगल पसरलेले असे हे अप्रतिम चित्र येथे दिसते. डोंगर माथ्यावर पोहचल्यावर चौहीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा डोकं वर काढून आपल्या स्वागतासाठी उभ्या असतात. मोठमोठ्या दऱ्या, त्यामध्ये घनदाट जंगलाचे साम्राज्य आणि वाहत्या धुक्यांची चादर मनाला मोहक करतात. ओढे-नाले खळखळून वाहत असतात. मध्येच पक्ष्यांचा किलबीलाट कानावर पडतो.
जंगलवाटा तुडवत जसजसे पुढे जाऊ तसतसेआपण दाट धुक्यांमध्ये हरवतो. मध्येच धुके पांगले की उन्हाच्या किरणांमधून सूर्यदर्शन होते. हे निसर्ग सौंदर्य टिपत पुढे गेले की खानू गावाचा धनगरवाडा येतो. येथे आल्यावर मात्र निश्चितच आपल्याला थांबावासे वाटते. धुक्यांच्या आणि जंगलाच्या गर्दीत हा धनगरवाडा लपलेला आहे. येथील कुडामेडीची घरे निसर्गपटलावर चितारल्यासारखी दिसतात. अनेक हौशी पर्यटक व गिर्यारोहकांची येथे वर्दळ असते. माळरानावर गुराखी बासरी वाजवत असतो आणि जनावरे त्याच्या बासरीच्या स्वरांवर मंत्रमुग्ध होऊन हिरव्यागार चाऱ्यावर ताव मारत असतात. गुराख्याला गुरांच्या मागे जाण्याची गरजच उरत नाही. बासरीच्या स्वरांमध्ये ही गुरे इतके रममाण झालेली असतात की आपल्या मालकाला सोडून लांब जातच नाहीत.
धनगरवाड्याच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर गेल्यावर “बा रायगड’चे दर्शन होते. रायगड जणू तेथील मावळ्यांना जगण्यासाठी धीर देत आहे, तर पुर्वेस लिंगाणा किल्ल्याचे दर्शन होते. या दोन किल्ल्यांचे दर्शन आणि सह्याद्रीच्या उंच कडेकपरांसोबत घनदाट हिरवेगार जंगल आणि त्यावर पसरलेली धुक्यांच्या मखमली चादरी पाहवतच बसावे वाटते. अशा निसर्ग सौंदर्य लाभलेल्या खानूला प्रत्येकाने भेट द्यावीच आणि हे निसर्ग सौंदर्य डोळ्यांत टिपून घ्यावे.