जुन्नर तालुक्यातील खानगावचे दोन वेळा उपसरपंचपद भूषविलेल्या, जुन्नर बाजार समितीच्या संचालिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा गांजाळे या “नवदुर्गा’शी संवाद झाला. त्यांच्या कार्याची आणि त्यांच्यातील अंतर्भूत “शक्ती’ची अनुभूती आली.
सुरेखा गांजाळे यांचे माहेर जुन्नर तालुक्यातील बोतार्डे. आजोबा कै. कोंडिभाऊ आमले यांच्या मुशीतून सुरेखाताई यांना सामाजिक वारसा लाभला. वडील हरिभाऊ आणि आई कुसुम यांची सांस्कृतिक शिकवण त्यांना मिळाली. या पार्श्वभूमीवर त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.
सध्याचे पंचायत समितीचे सदस्य दिलीप राजाराम गांजाळे यांच्याशी 1988 मध्ये लग्न होऊन त्या जुन्नर तालुक्यातीलच खानगाव येथे आल्या आणि त्यांचे कौटुंबिक पर्व सुरू झाले. या दरम्यान जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्या जीवनाला सामाजिक कार्याचे वलय मिळाले. आशाताईंनी खानगाव दत्तक घेतले असून, गावात अडीच कोटी रुपयांची कामे केली आहेत.
कुटुंब, समाज आणि राजकारण या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यारंभ झाला आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सासरच्या सगळ्यांच्या पाठिंबा त्यांच्या कार्याला मिळाला. त्यांचे सामाजिक-राजकीय कार्य आदर्शवत असेच आहे. गावाच्या विकासासाठी त्यांची सुरू असलेली धडपड त्यांच्या कार्यातून प्रतीत होते.
घरकुल योजना राबवणे, समाजातील वंचितांसाठी मदतीचा हात देणे, गावातील ग्रामपंचायतीची भव्य इमारत तयार करणे, पूर्व आणि पश्चिम ठाकरवाडी, गावठाण अशा तीन अंगणवाडी शाळांची दुरुस्ती, भैरवनाथ मंदिराचा सभामंडप, समाज मंदिर उभे करणे आदी कामांत त्या सक्रीय आहेत. आतापर्यंत तीन वेळा या परिसरात त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. जवळपास 800 झाडे सुस्थितीत असून, पाइपलाइनच्या माध्यमातून या झाडांना पाणीपुरवठा होत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
खानगावातील बचत गटातही सुरेखाताईंचे कार्य मोलाचे आहे. गटाच्या माध्यमातून मावळ भागातील आदिवासी पट्ट्यातील महिलांना कांडप मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन मिळवून देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम केले आहे. खानगाव येथे सुरेखाताई यांची शेती आहे. या दरम्यान आदिवासी महिला मजुरांशी त्यांचा संपर्क होतो, संवाद होतो.
यातून या महिलांच्या समस्या सोडवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. अनेक सरकारी योजना महिलांसाठी आहेत; पण पुरेशा कागदपत्रांअभावी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशावेळी सुरेखाताई महिलांना मार्गदशन करून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. या योजनांचा लाभ या आदिवासी महिलांना मिळाला, की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खरा समाधान देऊन जातो, असे सुरेखाताई आवर्जून सांगतात.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर खानगाव परिसरात “माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ योजनेंतर्गत दोन वेळा नागरिकांची तपासणी करण्यात आली. सुराळे, निरगुडे, घोगरेवाडी, आपटाळे येथेही तपासणी काम झाले. सुदैवाने एकही रुग्ण आढळला नाही; पण पहिल्या टप्प्यात काही रुग्ण सापडले. त्यावेळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
त्यावेळी या रुग्णांना जेवण, औषधे, त्यांच्या राहण्याची सर्व व्यवस्था येथे योग्य प्रकारे करण्यात आली होती. या भागात तीन आशा वर्करच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत काम केले जाते आहे. बालकांना, गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना आहार आणि अमृत पोषण योग्य प्रकारे दिले जाते की नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. सुरेखाताई आणि त्यांच्या महिला सहकारी यासाठी तत्पर आहेत.
सुरेखाताई गांजाळे या जुन्नर बाजार समितीच्या संचालक पदावरही आहेत. बाजार समिती सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य सुरू आहे. समितीच्या होणाऱ्या बैठका व इतरवेळीही खेळीमेळीचे वातावरण असते, त्यामुळे शिकायला आणि काम करायलाही उमेद मिळते, असे त्या आवर्जून सांगतात. या “नवदुर्गे’च्या यशस्वी कार्यास नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…!
शब्दांकन : अमोल गायकवाड, जुन्नर