प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -महापालिकेत 23 गावांचा समावेश झाल्यानंतर शहरातील सर्वाधिक उंच ठिकाणाचा मान धायरी येथील खंडोबाचा माळ या ठिकाणाला मिळाला आहे. समुद्रसपाटीपासून या डोंगराची उंची 860 मीटर आहे. तर, पुणे शहर हे समुद्रसपाटीपासून 560 मीटर उंचीवर वसलेले आहे. महापालिकेत धायरीचा समावेश होण्यापूर्वी “एआरएआय’ची वेताळ टेकडी होती. या टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंच आहे.
याबाबत पालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी माहिती दिली आहे. मुळा-मुठा नदीच्या संगमावर वसलेले पुणे शहर सुमारे 350 वर्षांपूर्वी “पुनवडी’ नावाने ओळखले जायचे. शहराच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून शहरातही सर्वच दिशांना जैवविवधतेने नटलेल्या टेकड्या आहेत. यात शेकडो प्रजातींची झाडे, प्राणी, पक्षी आहेत. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होण्यापूर्वी शहराची हद्द 331 चौरस किलोमीटर होती. ती आता 511 चौरस किलोमीटर झाली आहे. त्यामुळे हद्दीलगतच्या टेकड्यांचाही महापालिकेत समावेश झाला असून त्यातील काही टेकड्या जुन्या हद्दीतील टेकड्यांपेक्षा उंच आहेत.
पर्यावरणाचा समतोल…
वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढत असतानाच शहरातील टेकड्या आणि त्यावरील वृक्षसंपदा शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करत आहेत. त्यामुळे, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील टेकड्यांवरील अतिक्रमणे रोखणे, तेथील वृक्षसंपदा जपणे यासाठी महापालिकेने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. समाविष्ट गावांतील टेकड्यांवर अतिक्रमणे वाढत आहेत. त्या बांधकामांसाठी फोडल्या जात आहेत. हे रोखणे आवश्यक आहे.
टेकडी आणि समुद्रसपाटीपासून उंची
“एआरएआय’
(वेताळ टेकडी) : 700 मी.
तळजाई टेकडी : 680 मी.
रामटेकडी : 640 मी.
पर्वती टेकडी : 640 मी.