खानापूर (ता हवेली) : येथे पानशेत रोड लगत महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयासमोर शंभर-दीडशे फुटावर खानापूर गावातील व्यवसायिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावर आणि विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या ला सामोरे जावे लागत असून प्रशासनाने वेळीच कारवाई करत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालया समोर पानशेत रस्त्यावर खानापूर परिसरात व्यवसायिक हॉटेलवाले आणि चिकन-मटन दुकानदार आपला रोजचा कचरा शाळेच्या समोर शंभर-दीडशे फुटावर असलेल्या मोरीत आणि रस्त्याच्या कडेला टाकतात त्यामुळे या परिसरात नैसर्गिक विविधता असतानाही बकालपणा पसरला आहे. वन विभागानेही या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.