खंडाळा (सातारा) – राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 अर्थात पुणे-सातारा महामार्गावर सातारहून पुण्याकडे येताना खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या धोकादायक एस वळणावर अपघातांची मालिका अद्याप सुरुच आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करुनही आजवर हे एस वळण काढून न टाकल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात नाराजीचा सूर उमटतो आहे.
बुधवारी अगदी पहाटेच्या सुमारास या प्राणघातक वळणावर बेंगळुरूहून अहमदाबादकडे जाणारा एक अवजड मालवाहतुकीचा ट्रक कोसळला आहे. चालकाला या वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक (जीजे03-बीव्ही 4145) इतक्या विचित्रपणे संरक्षक कठड्यावर आदळला आहे की, ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रकमधील मशिनरी रस्त्यासह शेजारच्या खड्डयात पडली असून केबिन अस्ताव्यस्त झाले आहे.
खंडाळा पोलिस स्टेशनशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, साधारण मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. चालक नवीन असल्याने त्याला वळणाचा अंदाज आला नाही. अशातच अवजड मशिनरीमुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे. मात्र, या अपघातात जिवितहानी झालेली नाही. चालक केबिनची काच फोडून बाहेर आला. तो जखमी असून त्याला खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
सध्या खंबाटकी घाटाच्या सातारा-पुणे मार्गिकेमध्ये नव्याने सहापदरी बोगद्याचे काम सुरु आहे. या कामासाठीचे अवजड डंपर्स, ट्रक्स यांची वाहतूकही अव्याहत सुरु असते. या कामासाठी जागा हवी म्हणून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्त्यावरील एकच लेन सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळेही अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.