पुणे – ग्रामीण पोलीस दलामध्ये एका पोलीस स्टेशनला पाच वर्षे सेवाकार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशासकीय तसेच काही पोलिसांनी विनंतीपूर्व बदलीसाठी केलेल्या अर्जानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मे 2019 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील पोलीस स्टेशन देत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मर्जीतील प्रथमच पोलीस स्टेशन मिळाल्यामुळे बदली झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु बदली झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सध्या नेमणुकीस असलेल्या पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षकांनी बदली झालेल्या ठिकाणी सोडलेले नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बदली झालेले ठिकाणी त्यांच्या मुलांच्या शाळेचे प्रवेश, स्वतःच्या कुटुंबीयांना राहण्याची व्यवस्था करणे यांसह आदी महत्वाची कामे रखडलेली आहेत.
त्यातच विधानसभा निवडणुका येत्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्यामुळे बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी हजर होणे गरजेचे आहे. परंतु, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे बदली झालेल्या जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या आर्थिक व्यवहार, मलिद्यामुळे त्यांच्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडत नाहीत, अशी चर्चा जोर धरत आहे.
याकडे पोलीस अधीक्षक संदीप पाटील लक्ष देणार का, असा सवाल पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडण्यात यावे, अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
तपासाचे कारण…
ग्रामीण पोलीस दलात सुमारे तीनशे ते चारशे अधिकारी, कर्मचारी आहेत. यात संदीप पाटील यांनी प्रशासकीय आणि विनंती बदल्या केल्या आहेत. बदल्या झाल्यानंतर अनेक ठिकाणी संवेदनशील पोलीस ठाणी आहेत. तेथील यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया आदी कारणे असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी रूजू होता आले नाही. मात्र, काही कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धन्यता मानली असल्याची चर्चा होत आहे.
दीड महिन्यांपूर्वी बदली करण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आदेश दिले होते. त्यावेळी ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यांच्याकडील तपास पूर्ण करून त्यांना बदली झालेल्या ठिकाणी पाठवावे. अजून जिल्ह्यात काही ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांना बदली झालेल्या ठिकाणी सोडले नसल्यास त्या ठाणेप्रमुखांवर कारवाई करू.
– संदीप पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे