पुणे – खडकवासला, पानसेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत मागील 24 तासांत अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. या चारही धरणात मागील 24 तासांत 3.58 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला. खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, विसर्गामध्ये टप्पाटप्प्याने वाढ करण्यात आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे 470 मिमी इतक्या विक्रमी पावसाची टेमघर धरण परिसरात नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजता खडकवासला धरणातून 10 हजार क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा 16.37 टीएमसी म्हणजे 58.18 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असून, या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.
शहराला खडकवासला प्रकल्पातील धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच ग्रामीण भागात शेतीला या धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या धरणांच्या पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते. बुधवारी रात्रीपासून या धरणाच्या परिसरात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे-नाल्यांद्वारे पाणी धरणात मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.
बुधवारी खडकवासला धरण 50 टक्के भरले होते. गुरुवारी सायंकाळी धरण 100 टक्के भरले आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दुपारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यातून सुरुवातीस 2 हजार क्युसेक तर सायंकाळी 5 हजार क्युसेक तर रात्री आठ वाजता 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
विक्रमी पाऊस
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत गुरुवारी मध्यरात्री विक्रमी पाऊस झाला. यात मागील 24 तासांत खडकवासला-49, पानशेत-250, वरसगाव-284 आणि टेमघरमध्ये तब्बल 470 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता.