खडकवासला – पर्यटकांकडून होणारे अनियंत्रित आणि अस्ताव्यस्त पार्किंग आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या जुजबी उपाययोजना यामुळे खडकवासला धरण चौपाटी परिसरात झालेल्या वाहतूक कोंडीवर व पर्यटक पाण्यात उतरू नये म्हणून उपाय योजना व त्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरले. तथापि प्रशासनाने नुकतीच केलेल्या संयुक्त पाहणीत ठरविण्यात आलेल्या उपाययोजना अमलबजावणी अभावी कागदावरच राहिल्या. असल्याने प्रशासनाची अवस्था ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अशी झाली आहे.
सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार, रविवारी खडकवासला धरण चौपाटी, सिंहगड, पानशेत परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. खडकवासला धरण चौपाटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर चव चाखण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात. शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ही संख्या मोठी असते त्यामुळे रस्त्याच्या कडेलाच अस्ताव्यस्त आणि अनियंत्रित पद्धतीने पर्यटक आपल्या वाहनांची पार्किंग करतात. त्यामुळे नियमित होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन दोन तीन किलोमीटर रांगा लागतात. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांनाही मनस्ताप होतो यावर उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी पाटबंधारे विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती.
खडकवासला परिसरात पर्यटक पाण्यात उतरू नयेत म्हणून व मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चौपाटीवरील बांबूचे कुंपण करण्यात आले आहे. परंतु आज सर्व नियम पायदळी तुडवत पर्यटक पाण्यात उतरले विशेष म्हणजे दिड ते दोन वर्षाच्या मुलीला खोल पाण्यात घेऊन फोटो काढण्यात येत होते. या पर्यटकांना हटवण्यासाठी कोणत्याच विभागाचे कर्मचारी तिथे दिसून आले नाहीत.