नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात पावसाने कहर केला आहे. काही राज्यात तर पुराने अनेक गावांना बेटांचे स्वरूप आले आहे. केरळमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. एर्नाकुलम, त्रिशूर, पठानमथिट्टा, मलप्पुरम याठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशातच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना केरळमधील वायनाडमध्ये घडली. लष्कराच्या मदतीने एका नवजात बालकाची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली.
वायनाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका नवजात बालकाची आज लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. त्यानंतर सर्वांनी लष्कराचे आभार मानले आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत 42 लोकांनी आपले जीव गमावले आहेत. तर 22 हजारांपेक्षा अधिक लोकांना कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग क्षेत्रात पाणी भरल्याने रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.