कोची – केरळला हादरवणाऱ्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर पोहचली आहे. भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली 20 झोपड्या गाडल्या गेल्याने अजूनही 46 जण बेपत्ता आहेत.
केरळच्या इडुक्की जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी भूस्खलन झाले. त्यामुळे डोंगरालगत चहामळ्यात काम करणाऱ्या मजुरांनी उभारलेल्या झोपड्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या. त्या दुर्घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले.
मात्र, संततधार पावसामुळे त्या कार्यात अडथळे येत आहेत. त्या कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) दोन पथके सहभागी झाली आहेत. त्यांना पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिकही सहाय्य करत आहेत. भूस्खलनानंतर शुक्रवारी 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार चालू आहेत.
आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे मोठेच आव्हान यंत्रणांपुढे आहे. भूस्खलनामुळे दिलखेचक निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरावरील खडकाळ भाग आणि माती खाली ढासळली. त्यामुळे तो बराचसा परिसर सपाट बनून चिखलमय झाला आहे. तो ढिगारा उपसण्यासाठी मदत आणि बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत.