इड्डूक्की (केरळ) – केरळ येथे चहामळ्यातील मजुरांच्या झोपड्यांवर झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. रविवारी सायंकाळी आणखी 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दुर्घटना घडून तीन दिवस झाले तरी अद्याप मदत कार्य सुरू आहे. पेट्टीमडीजवळ राजमळा येथे झालेल्या या भूस्खलनात ढिगाऱ्याखाली गाडलेल घेलेल्यांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित श्वानांचा वापर करण्यात येत आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळावर 78 जण होते. त्यातील 12 जणांना वाचवण्यात यश आले असून 42 मृतदेह सापडले आहेत. अन्य लोकांचा तपास करण्यात येत आहे, असे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरील छायाचित्रात सर्वत्र चिखल पसरलेला आणि त्यात झोपड्यांच्या पत्र्यांचे तुकडे विखुरल्याचे चित्र दिसत आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन बालकांचे मृतदेह हाती लागले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 55 जणांचे पथक दलाच्या दक्षिणेकडील राज्यांच्या प्रमुख रेखा नांबीयार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने या भागात सोमवारी पुन्हा रेड ऍलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मध्य केरळात जनजीवन विस्कळीत
अतीमुसळधार पावसामुळे केरळमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखलक्षेत्रातील पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोट्टयम आणि अलापुझा जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मनारकाड भागात आतील प्रवाशांसह एक कार रविवारी वाहून गेली. त्याचा शोध रात्री उशीरापर्यंत लागला नव्हता.