गुरुवायुर (केरळ): देशातील राजकीय निरीक्षकांना आणि राजकीय पक्षंना यंदाच्या लोकसभेच्य निवडणुकीच्यावेळी जनतेचा कल समजला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केरळमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना मोदी यांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवात भाजपला निवडून दिल्याबद्दल देशवासियांना धन्यवाद दिले आहेत. केरळमधून भाजपचा एकही खासदार निवडून आलेला नसतानाही अपल्याला येथे यावेसे वाटले कारण वाराणसीप्रमाणेच केरळ आपल्याला प्रिय आहे. जनताच देव असते, हे या निवडणुकीमध्ये दिसून आले असल्याचे मोदी म्हणाले.
भाजपच्यावतीने आयोजित “अभिनंदन’ सभेमध्ये ते बोलत होते. सभेपूर्वी मोदींनी कृष्ण मंदिरात जाऊन पूजा केली. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पंडीतांना आणि सर्वेक्षण करणाऱ्यांनाही जनतेचा कौलच समजला नाही. पण जनतेने भाजपला प्रचंड बहुमत दिले. जनतेने नकारात्मकतेला नाकारले आणि सकारात्मकतेला स्वीकारले हेच या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विरोधात केलेल्या द्वेषमूल प्रचाराच्या संदर्भाने ते बोलत होते. केरळमध्ये भाजपचा एकही खासदार निवडून आला नसला तरी आपण केरळसाठी पूर्ण योगदान देणार आहोत. निवडणुकांना लोकशाहीमध्ये महत्व असते. पण 130 कोटी जनतेची काळजी घेणे ही विजेत्याची जबाबदारी आहे. ज्यांनी विजयी केले आणि ज्यांनी विजयी केले नाही, त्या सर्वांसाठी आपण काम करणार असल्याचे मोदींनी सांगितले.
केरळमध्ये निपाह विषाणुचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार केरळबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र सरकार या परिस्थितीचे बारकाईने अवलोकन करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.