त्रावणकोर (केरळ) – कोणत्याही मंदिराच्या कार्यक्रमात केवळ राजकीयदृष्ट्या तटस्थ रंगांचा वापर केला जाईल, असा दबाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर आणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिर आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वादावर केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरले आहे.
खरं तर, मेजर वेल्लयानी भद्रकाली देवी मंदिराच्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने प्रशासनाच्या आदेशाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले. कलियुत्तू उत्सवाच्या सजावटीसाठी केवळ भगव्या रंगाला परवानगी देता येणार नाही, असे प्रशासनाने मंदिर मंडळाला सांगितले होते. यासंदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या याचिकांवर न्यायालयाने म्हटले की, मंदिरातील लोकांची पूजा, कार्यक्रम आणि समारंभांमध्ये राजकारणाची भूमिका असू शकत नाही. जसा भगवा रंगच वापरण्यासाठी मंदिर चालवणाऱ्या मंडळावर दबाव आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उपासक किंवा भक्ताला नाही, त्याचप्रमाणे मंदिराच्या कार्यक्रमात राजकीय तटस्थ रंगाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीसही दबाव आणू शकत नाहीत. परंपरा आणि श्रद्धेनुसार मंदिरातील कलियुत्तू उत्सवासाठी कोणता रंग वापरायचा हे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड ठरवेल. त्यावर कोणालाही हरकत घेता येणार नाही.
मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला काही गैरप्रकार घडू शकतात, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी भीती असल्यास मंदिर मंडळ पोलिसांना कळवू शकते आणि अशा घटना रोखण्यासाठी पोलिस अथवा जिल्हाधिकारी यांना आवश्यक ती पावले उचलावी लागतील. केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने धार्मिक स्वातंत्र्याची बूज राखली गेल्याचे मानले जाते. हा निकाल न्यायदानाच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.