पुरातील बळींची संख्या 60वर
तिरुअनंतपुरम – दक्षिण भारतातील केरळ राज्यालाही पावसाने झोडपले असून रविवारी आणखी 3 जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या 60वर गेली आहे. राज्यात अनेक नद्यांना पुर आला असून 2 लाख 27 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
राहुल गांधींकडून पुरग्रस्तभागाची पाहणी
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे आज दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी यांनी कोट्टाक्कल येथील निलंबूर, मंबाड, इदवन्नाप्पारा येथील मदत शिबिरांना भेट दिली. त्यानंतर मलप्पुरम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तसेच राहुल गांधी हे वायनाड या आपल्या मतदारसंघाला उद्या भेट देणार आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् यांनी रविवारी सकाळी पुरग्रस्त भागांची पाहणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. केरळमध्ये चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागातील पुरस्थिती गंभीर आहे. यात आतापर्यत 60 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1 हजार 551 मदत शिबिरामध्ये 2 लाख 27 हजार जणांचे स्थळांतर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पी. विजयन् म्हणाले, राज्यात रविवारी पावसाचा जोर थोडा कमी असला तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. डोगराळ भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. पण भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्तकता बाळगावी, असे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या धरणांमधील पाणीपातळी अद्याप नियंत्रणात असल्याने धोक्याची कमी शक्यता आहे. सध्या इडुक्की धरणात 36.61 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कन्नूर, कसारागोड आणि वायनाडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. कोझीकोड जिल्ह्यातील वडकारा येथे 21 सें.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. राज्यात रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत येथे सर्वाधिक पाऊस पडला. त्या पाठोपाठ कोडुंगल्लुर येथे 19.9 सें.मी., तर पेरिंथमन्ना येथे 13.8 सें.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.