नवी दिल्ली – शेतकऱ्यांवर अन्याय करणारी विधेयके जबरदस्तीने राज्यसभेत संमत केल्याच्या प्रकरणात राज्यसभेच्या सदस्यांनी संसदे बाहेर जे धरणे आंदोलन सुरू केले आहे त्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी समर्थन केले आहे. त्यांनी सरकारच्या या विधेयकांचाही जोरदार निषेध केला आहे.
राज्यसभेतून जे आठ आमदार निलंबीत करण्यात आले आहेत त्या खासदारांनी आपल्यावरील कारवाईच्या विरोधात संसदेबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यात आम आदमी पक्षाचे सदस्य संजयसिंह यांचाही समावेश आहे.
हे आठ खासदार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. त्यांनी असुविधा सोसून काल रात्रभर संसदेबाहेरील आपले ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. ते स्वतासाठी काहीही मागत नाहीत. ते केवळ लोकशाही संकेतांचे रक्षण व्हावे, संसदीय प्रथांचे पालन सुरू राहावे या मागणीसाठी हे आंदोलन करीत आहेत.
सरकारने सर्व संसदीय संकेत धुडकाऊन बळाच्या जोरावर ही शेती विरोधी विधेयके राज्यसभेत संमत केली आहेत. त्यातून शेतकरी संपणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी सरकारच्या विरोधात आंदोलनात उतरला आहे.
ही घातक विधेयके मतदान न घेताच राज्यसभेत कशी संमत करण्यात आली असा सवालही त्यांनी सरकारला केला. सरकार अशा प्रकारे कायदे संमत करणार असेल तर संसद अधिवेशन घेण्याची गरजच काय असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.