नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपचे नेते विजेंदर गुप्ता यांच्या विधानसभेवरील निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यासंबंधीच्या स्वतंत्र याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
रमेश खत्री या व्यक्तीने दोन्ही याचिका दाखल केल्या आहेत. केजरीवाल आणि गुप्ता यांनी निवडणूक खर्चाबाबत खोटी माहिती दिली. त्यांनी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला. त्याशिवाय, निवडणुकीवेळी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला, असा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. केजरीवाल आणि गुप्ता यांच्यावर पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
चालू वर्षी फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत खत्री आपचे प्रमुख केजरीवाल यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवार या नात्याने त्यांनी केजरीवाल यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. तर, मतदार या नात्याने त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आलेल्या गुप्ता यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकांवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल.