बलिया – आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, तृणमुल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना एकत्र आणून भाजपच्या विरोधात नवीन आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत असे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले आहे.
राजभर यांचा पक्ष सन 2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा मित्र पक्ष होता. पण त्यांनी आता भाजपची संगत सोडली आहे. ते म्हणाले की, कालच या संभाव्य आघाडीच्या संबंधात मी आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजयसिंह यांची भेट घेतली. या प्रस्तावाला त्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
या पक्षांच्या एकत्र आघाडीला भागीदारी संकल्प मोर्चा असे नाव देण्यात येणार आहे. तथापि त्यात सहभागी होण्याच्या संबंधात केजरीवाल हेच अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढील आठवड्यात आपण दिल्लीत केजरीवाल यांना भेटणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि तृणमुल कॉंग्रेसच्या सरचिटणीसांशी आपली प्राथमिक बोलणी झाली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.