सुलतानपुर- सन 2014 च्या लोकसभा निवडणुक प्रचारात अरविंद केजरीवाल यांच्यावर विविध कारणांनी गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या प्रकरणात त्यांना आज जामीन मंजुर करण्यात आला आहे. जातीय सलोखा नष्ट होईल अशी विधाने केली या आरोपासह अन्य आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.
त्या संबंधात एकूण दोन गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. त्याच्या आज झालेल्या सुनावणीच्यावेळी केजरीवाल कोर्टात उपस्थित होते. कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजुर केला. त्या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी आता 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याची आपल्याला मूभा द्यावी अशी विनंतीही केजरीवालांनी कोर्टाला केली.
दरम्यान त्यांच्यावर दाखल झालेल्या या दोन गुन्ह्यांना केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सन 2014 सालच्या लोकसभा निवडणूक प्रचार काळात अमेठीतील दोन पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. तेथील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी केजरीवाल तिकडे गेले होते.