नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबंधीत भागातील आमदारांची बैठक घेऊन ही स्थिती नियंत्रणात कशी आणता येईल यावर चर्चा केली. दिल्लीकरांनी हिंसाचार टाळावा आणि दिल्लीतील शांततेचे वातावरण कायम ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की दिल्लीत पोलिसांची संख्या कमी आहे आणि वरून आदेश आल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्यास पोलिस असमर्थ आहेत. दंगलीतील जखमींना ज्या रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सर्वोत्तम आणि तातडीने उपचार केले जावेत अशी सुचनाहीं त्यांनी सर्व रूग्णालयांना केली.
जाळपोळीच्या घटना घडत आहेत, या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी पोलिसांशी समन्वय साधून आगीच्या घटनांपासून लोकांचा व मालमत्तेचा बचाव करावा अशी सुचनाहीं त्यांनी केली आहे. हिंसाचार टाळण्यासाठी सीमा सील करण्याची सुचनाही त्यांनी पोलिसांना केली आहे. बाहेरच्या लोकांनी दिल्लीत येऊन गोंधळ घालता कामा नये याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्व जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात शांतता बैठका घ्याव्यात आणि त्यात सर्वधर्मिय प्रतिनिधींना बोलावण्यात यावे अशा सूचनाहीं केजरीवालांनी दिल्या आहेत.