नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत 4 मोठ्या घोषणा केल्या. यात करोनामुळे आपला जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. तसेच ज्या घरातील कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला पेन्शनचीही घोषणा केली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत अनेक कुटुंबांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीचाच करोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र गेले आहे. दुसरीकडे अनेक आईवडिलांच्या कमावणाऱ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना कशी मदत करता येईल यावर दिल्ली सरकार विचार करत होती. आज यावरील निर्णयांची घोषणा करत आहोत.
संकटाच्या काळात ज्या घरांत कोणाचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबांना पन्नास हजार रूपये दिले जाणार आहेत. तर ज्या घरातील कमावत्या सदस्याचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाला दरमहा 2500 रूपये पेन्शन दिले जाणार आहे.
तसेच जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांनाही दरमहा 2500 रूपये दिले जाणार असून त्यांच्या शिक्षणाची सोय सरकार करणार आहे. दिल्लीतील 72 लाख रेशनधारकांना दिल्ली सरकार पाच किलो धान्य मोफत देते. आता केंद्र सरकारही पाच किलो धान्य त्यांना देणार आहे. त्यामुळे करोनाची झळ बसलेल्या गरीब दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.