लंडन -सातत्यापूर्ण फलंदाजी करत असलेला सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला भारतीय संघाने कसोटी संघाचा राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडला नेले आहे. त्याला अंतिम संघात न खेळवणे खूप मोठी चूक ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने व्यक्त केले आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पॉंटिंग बोलत होता.
जयस्वाल प्रचंड भरात आहे, त्याच्याकडून मोठ्या खेळीही होत असल्याचे आपण आयपीएल स्पर्धेत पाहिले. खरेतर एखाद्या खेळाडू त्याच्या सर्वोत्तम भरात असतो तेव्हाच त्याला जास्तीत जास्त संधी देणे गरजेचे असते. मात्र, भारतीय संघाच्या निवड समितीने त्याची अंतिम संघात निवड करण्याच्या जागी राखीव म्हणून निवड केल्याचे मला आश्चर्य वाटले.
केवळ जयस्वालच नव्हे तर कसोटी संघात परिपूर्ण अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्यालाही स्थान देण्यात आलेले नाही. निवड समितीने भारतीय संघ निवडताना कोणता विचार केला असावा. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होत आहे भारतात नव्हे. संघात दोन फिरकी गोलंदाज खेळवण्यावर भारतीय संघ भर देणार हे तर उघड दिसत आहे.
मात्र, केवळ दोन वेगवान गोलंदाजांवर कसोटी सामने जिंकता येत नाहीत. संघात अष्टपैलूचीच जास्त गरज असते, असेही तो म्हणाला. या स्पर्धेचा हा एकमेव सामना आहे, त्यामुळे जयस्वालच्या समावेशाने फलंदाजीची ताकद वाढली असती व प्रमुख फलंदाजांवरचे दडपणी कमी झाले असते. मी कर्णधार असतो तर मी हेच केले असते, असेही त्याने सांगितले.
जयस्वालचा नेटमध्ये कसून सराव
भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून वर्णी लागली असली तरीही भारताच्या कसोटी संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्लंडला दाखल झालेल्या यशस्वी जयस्वालने नेटमध्ये कसून सराव सुरू केला आहे. प्रमुख फलंदाज विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही त्याचा सराव पाहात असून त्याला योग्य त्या सूचनाही करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले.
सध्यातरी कसोटीचा विचार नाही – पंड्या
भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मला अद्याप काही काळ द्यावा लागेल. मी पूर्णपणे गोलंदाजी करण्याची क्षमता बाळगेन तेव्हाच कसोटी संघातील स्थानाच विचार करेल, असे पंड्याने म्हटले आहे. सध्या मी कसोटी खेळण्याच्या मनस्थितीत नाही मग अशा वेळी एखाद्या योग्य खेळाडूची जागा मी का घेऊ. मलाही कसोटी खेळायची आहे पण त्यासाठी मला खूप पूर्वतयारी करावी लागेल व जेव्ही ती पूर्ण होइल तेव्हाच मी संघात स्थान मिळावे अशी आशा करीन, असेही त्याने सांगितले.
ईशानच्या दुखापतीची चिंता
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना ईशान किशनला दुखापत झाली. त्यानंतर तो त्या सामन्यात फलंदाजीला येऊ शकला नाही. आताही तो पूर्ण मॅचफिट आहे का त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकदामी व बीसीसीआयने देखील काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही, अशा स्थितीत भरतलाच अंतिम संघात खेळवले जाणार असेच चित्र दिसत आहे.
भरतची कामगिरी कशी होणार
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघात केएस भरत हा यष्टिरक्षक होता मात्र, वृद्धिमान साहा यालाच खेळवले गेले. भरतला एकही सामना खेळवला गेला नाही. त्यामुळे त्याने तब्बल दोन महिने प्रत्यक्ष सामनाच खेळलेला नाही. अशा स्थितीत एकदम ऑस्ट्रेलियाच्या समोर तो कशी कामगिरी करेल असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही भरतला भारतीय संघात संधी देण्यात आली होती मात्र, त्याच्याकडून काही खास कामगिरी झालेली नाही त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून कर्णधार रोहित शर्मा काय आणि किती अपेक्षा करणार हे महत्त्वाचे ठरेल.