नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अक्षेपार्ह विधान केल्याने पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला भारतीय क्रिकेटपटूंनी खडेबोल सुनावले आहे. डोक्यावर परिणाम झाला आहे का, तोंड सांभाळून बोल अशा शब्दांत हरभजनसिंग, सुरेश रैना, शिखर धवन व गौतम गंभीर यांनी आफ्रिदीवर ताशेरे ओढले आहेत.
कोणताही संदर्भ नसताना विनाकारण पंतप्रधानांवर टीका करताना आफ्रिदीला लाज कशी वाटली नाही. पाकिस्तानातील हिंदूंना करोनाच्या संकटात मदत केल्याबद्दल त्याचे कौतुक केले असले तरीही त्याची असंबंध बडबड सहन करणार नाही. देशाला गरज भासली तर हाती बंदूकदेखील घेईन. आपली लायकी पाहावी व मगच तोंड उघडावे. आपण कोण आहोत, कोणाबद्दल बोलत आहोत याचे भान ठेव, अशा शब्दांत हरभजनने आफ्रिदीला फटकारले आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुझ्या देशाला जागतिक पातळीवर साधी ओळखही निर्माण करता आली नाही. त्यामुळे भारताबाबत बोलण्यापेक्षा तुझ्या अपयशी देशाला पुढे आणण्यासाठी काहीतरी कर, अशी संतप्त टीका सुरेश रैना याने आफ्रिदीवर केली आहे. तुझ्या देशाची जितकी लोकसंख्या आहे त्या सर्वांना जरी घेऊन आलास तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे व कायमच राहील. बेताल बडबड करण्यापेक्षा आत्मपरीक्षण कर, असा सल्ला शिखर धवनने आफ्रिदीला दिला आहे.
लायकी ओळख….
आफ्रिदी, तुझी व तुझ्या देशाची लायकी संपूर्ण जगाला माहिती आहे. सामाजिक मदतीचा दिखावा करून सातत्याने भारतावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या देशाची स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न कर, अशा शब्दांत गौतम गंभीरने आफ्रिदीला लक्ष्य केले आहे.