आमदार चंद्रकांत पाटील यांचा टोला
पुणे – आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय. त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका.., तुम्हाला जे फुकटात मिळाले ते कसे टिकवता येईल ते अगोदार पहा, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर लगावला.
मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाने अनेक प्रश्न सोडविले आहेत. तसेच, मी पदवीधर आमदार असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. निवडणुकीत चॅलेंज हे असतेच, गाफील राहून चालत नाही. मात्र, ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. उद्यापर्यंत या निवडणुकीच्या रिंगणात कोणकोण आहे, हे स्पष्ट होईल. यावेळी सरकारवर हल्लाबोल करताना या सरकारकडून नव्याने काही सुरू करण्यापेक्षा आम्ही जे केले ते बंद करण्याच्या मागे आहेत.
पदवीधर निवडणूकीत पदवीधर व्यक्ती मतदान करत नाही, ही शोकांतिका आहे. त्याहीपेक्षा मतदान केलेल्यांमध्ये मत बाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. आता, परंपरागत नोकऱ्या संपत चालल्या असून कौशल्य असेल तरच नोकऱ्या मिळतात. सरकारी खात्यात अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी आमचा संघर्ष नेहमीच राहिल, असे पाटील यांनी सांगितले.