कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली उमेदवारी निश्चित असून त्यासाठी दांडा तयार ठेवा. कोणता झेंडा घ्यायचा ते नंतर ठरवू. पण कार्यकर्त्यांनी दांडा मजबूत ठेवा, असे आवाहन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.
साळशिरंबे, ता. कराड परिसरातील उंडाळे पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यासह परिसरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते व विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, 2014 ची निवडणूक माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी लढवली. या निवडणुकीचा इतिहास तुम्हाला सांगायला नको. त्यावेळी आपला निसटत्या मतांनी पराभव झाला होता. मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यासाठी माझ्यावर कुभांड रचले होते. त्यामुळेच आपला पराभव झाला असून हा पराभव मी मानत नाही.
त्या पराभवाची सल आपल्यामध्ये आहे. मला सत्तेचा कधी हव्यास नाही, पण मतदार संघातील कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आता मी स्वतः निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ मंडळी व युवा कार्यकर्त्यांनी कराड दक्षिणच्या स्वाभिमानासाठी पुन्हा एकदा गेलेली आमदारकी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. ते पुढे म्हणाले, येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष कोणता हा विचार करत बसण्यापेक्षा आपली रयत संघटना ही पक्षापेक्षा भक्कम आहे.
शिवाय आपला दांडा भक्कम ठेवूया. मग कोणता झेंडा दांड्यात अडकवायचा, हे नंतर ठरवू. पण आज रोजी आपला दांडा ताठ आणि भक्कम ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत सर्वांनी उदयसिंह पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कराड दक्षिण मधील रुतलेला विकासाचा रथ उदयसिंह पाटील यांनी बाहेर काढावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, पांडूरंग डांगे, पं. स. सदस्य काशिनाथ कारंडे, तुकाराम पाटील, धनाजी पाटील, अशोक पाटील, बी. एल. पाटील यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.