गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन
वडगाव मावळ – सलग तिसाऱ्यांदा कारवाई झाल्यावर वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येईल. पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लेन शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी (दि. 17) केले.
उर्से टोल नाका येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई लेन कटिंग, वाहन कारवाई, सुरक्षित प्रवासासाठी सूचना कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या वेळी महामार्ग सुरक्षा पथक पुणे पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते, पोलीस उपनिरीक्षक अमोल पोवार, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, वाल्मिक फरांदे, सचिन कडाळे, परशुराम जाधव, निलेश सरोदे, अजय पाटसकर, आयआरबी व्यवस्थापक वामन राठोड, पथकर व्यवस्थापक धनंजय पणशीकर आदी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री देसाई पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, या मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाय योजना करणार आहे. अपघातातील जखमींना त्वरित मदत मिळावी यासाठी उपाय योजना केल्या जातील.
महामार्ग सुरक्षा पथक पुणे पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले की, वाहतूक नियमन करताना वाहतूक नियमावलीची जनजागृती केली जाते. अपघात स्थळी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध केली जाते. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड तसेच नियमबाबत जनजागृती केली जाते. आता 24 तास वाहतूक असल्याने पेट्रोलिंग सुरु असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर यांनी केले.