नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेत भारताने पाच सामने खेळूनही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस कोण येणार हे कोडे अद्याप सुटलेले नाही. त्यातच अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेल्या संथ खेळीमुळे, संघ व्यवस्थापन वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात धोनीची जागा बदलण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये केदार जाधव हा चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय असल्याचे मत भारताचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी मांडले आहे.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, केदार जाधव हा हुशार खेळाडू आहे, याचसोबत तो चांगल्या प्रकारे एकेरी दुहेरी धावा करत स्ट्राईक रोटेट करतो. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो चांगले फटके खेळू शकतो, त्यामुळे माझ्या मते केदार जाधव चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय आहे. केदार जाधव व्यतिरीक्त गायकवाड यांनी दिनेश कार्तिकच्या नावालाही चौथ्या क्रमांकाच्या जागेवरची पसंती दिली आहे. कोहलीसोबत स्ट्राईक रोटेट करणारा खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण गरजेचे आहे. हे दोन्ही खेळाडू चौथ्या क्रमांकाच्या जागेवर खेळू शकतात, असे गायकवाड म्हणाले.