कोल्हापूर: चालू खरीप हंगामामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संबंध देशात अव्वल ठरली आहे. दिलेल्या इष्टांकाच्या 208 टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बॅंकेने हा अव्वल क्रमांक मिळविला आहे. 686 कोटीचा इष्टांक असलेल्या या बॅंकेने तब्बल 1429 कोटी रुपये खरीप पीक कर्जाचे वाटप केले आहे.
महाराष्ट्रासह संबंध देशातच खरिपाच्या पीककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही हात आखडता घेतला आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीने आलेला महापूर व गेल्या तीन महिन्यांत करोनामुळे अडचणीत असलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याला केडीसीसी बॅंकेने आधार दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून मिळालेल्या इष्टांकाच्यापेक्षा किती तरी अधिक कर्जवाटप गेल्या पाच वर्षांत केले आहे. खरीप हंगामाच्या पिकांमध्ये ऊस, केळी या बारमाही पिकांसह भुईमूग, भात, सोयाबीन, उडीद, सूर्यफूल, नाचणी या खरीप पिकांचा समावेश आहे.