Katraj Kondhwa Road – कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची महापालिका आयुक्तांनी रविवारी पाहणी केली आहे. यासाठी भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन विभाग प्रमुख निखील मोरे, उपायुक्त शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे मुख्य अभियंता बनकर आदी उपस्थित होते. सात एप्रिलपासून जागेवर बॉण्ड्री मार्किंग तसेच फळझाडे आणि इतर झाडांची मोजणी करण्याचे काम विविध विभागांच्या समन्वयातून सुरू करण्यात आले आहे. एकूण ३.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, भू-संपादन प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे. अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, लवकरच मंजुरी अपेक्षित आहे, असे आयुक्तांनी सांगितले. कात्रज–कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत आहेत. नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याला मदत होईल, असे आयुक्तांनी नमूद केले. भू-संपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यांना प्राधान्य देत, संबंधित सर्व प्रशासकीय टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले.