पुणे – गणेश खिंड रस्त्यावरील कस्तुरबा वसाहत आणि इंदिरा वसाहत परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या भागातील मतदारांना दिली.
बहिरट यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत, चापेकरनगर, खैरेवाडी, जवाहरनगर, अशोकनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
या भागात सांडपाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. तसेच पावसाळ्यातही पाणी साचून राहिल्याने आरोग्य प्रश्न निर्माण होतो. परिणामी, घुशींची संख्या वाढली असून अनेक घरांचे नुकसान त्यामुळे होत असल्याची तक्रार मीना गायकवाड यांनी मांडली. गायकवाड यांच्यासह इतर महिलांनी येथील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी बहिरट यांच्याकडे केली.
यावेळी बहिरट म्हणाले, या भागात सुमारे 5 हजार घरे असून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सर्व प्रयत्न केले जातील. नगरसेवक म्हणून जसा आपला प्रभाग समस्यामुक्त केला, त्याच धर्तीवर या भागातही सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पदयात्रेत माजी नागसरसेवक कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, श्रीकांत पाटील, आप्पा रेणुसे, बाळासाहेब चव्हाण, शिला भालेराव, मीना गायकवाड, मयुरी शिंदे आदी सहभागी झाले होते. पुणे शहर रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे, मोहनसिंग रजपूत, मारुती डेंगळे, सलीम मुल्ला, हनुमंत अहिरे, महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाच्या पुणे शहर शाखेचे अध्यक्ष शरद सनस, ज्ञानेश्वर मांजरेकर, यांनी बहिरट याना पाठिंबा जाहीर केला.