श्रीनगर – काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायनाची तयारी सुरू केली आहे. अनंतनागच्या मट्टानमध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने काश्मिरी पंडित आपले सामान घेऊन बनिहाल (जम्मू) येथे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका वृतपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मत्तन पंडित कॉलनीतील लोकांनी बनिहालला जाण्यासाठी अनंतनाग जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तर अनंतनागच्या वैसू परिसरातही काश्मिरी पंडित पळून जाण्याच्या तयारीत आहेत.
पंडितांनी सांगितले की त्यांनी सामान पॅक केले आहे, परंतु सुरक्षा दलाचे कर्मचारी त्यांना छावणीतून बाहेर पडू देत नाहीत. खोऱ्यातील सततच्या अतिरेकी कारवायांनंतर काश्मिरी पंडितांनी खोरे सोडून जाण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. काश्मीरमध्ये 19 दिवसांपासून पंडितांची निदर्शने सुरू आहेत.
मत्तन येथे राहणारे काश्मिरी पंडित रंजन जोशी यांनी सांगितले की, आमच्या भावांना दररोज गोळ्या घातल्या जात आहेत. सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. ते म्हणाले की, शुक्रवारपासून आम्ही स्थलांतर सुरू करू, सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते थांबवता येणार नाहीत.