श्रीनगर -दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांच्या एका संघटनेने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने हस्तक्षेप करून सरकारला सर्व धार्मिक अल्पसंख्याकांना काश्मीर खोऱ्याबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती त्या संघटनेने केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही काळापासून दहशतवादी काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या अल्पसंख्याकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा आधार घेऊन काश्मिरी पंडित संघर्ष समिती या संघटनेने न्यायालयाला साकडे घातले आहे.
त्या संघटनेने ई-मेलच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे याचिका पाठवली आहे. काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याकांच्या जीविताला दहशतवाद्यांपासून धोका आहे.
जून 2020 पासून अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांना प्रारंभ झाला. तेव्हापासून 31 मे 2022 पर्यंत 12 अल्पसंख्याकांवर हल्ले झाले. त्या हल्ल्यांत 11 जण दगावले. हिंदूंना काश्मीर सोडायचे आहे. पण, सरकार त्यांना परवानगी देत नाही, असा दावा संबंधित संघटनेने केला आहे.