मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातावरण चिघळत चालले आहे. याचीच माहिती घेण्यासाठी आणि वातावरणावर तोडगा काढण्यासाठी गृहमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान, यासर्व प्रकरणावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून सरकारवर निशाणा साधला आहे.
या सर्व प्रकारावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितले होते आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
केंद्र सरकारविरोधात विरोधक संताप व्यक्त करत असून संजय राऊत यांनीही यावरुन टीका केली आहे. आज जे हत्यासत्र सुरु आहे त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. “आजही दोन लोकांची हत्या झाली आहे. लोकांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन सुरु आहे. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
मोहन भागवत यांनी यापुढे प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घऱात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही”.
“काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरं तर आजे जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.