नवी दिल्ली – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयोजित करत असलेल्या काश्मीर लीगला अधिकृत मान्यता नाही. तसेच येथे ही स्पर्धा भरवून पाक मंडळ तसेच त्यांचे सरकार भारताच्या विरोधात हे सर्व करत आहेत, असे ठाम मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या कठोर भूमिकेमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.
काश्मीर हा आमचाच एक भाग आहे, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा हा एक प्रयत्न असल्याचे आता समोर आले आहे. पाकिस्तानने भारताच्या विरोधात जाऊन आता काश्मीर प्रीमिअर लीग सुरू करण्याचे ठरवले आहे.
पण बीसीसीआयने याबाबत कडक पवित्रा घेतला आहे. या लीगसाठी बीसीसीआयने कोणताही अडथळा निर्माण करू नये. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यामुळेच बीसीसीआयने या लीगला पाठिंबा द्यायला हवा, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने व्यक्त केले होते. आता त्याच्यावरही टीकेची झोड उठली आहे. पाकिस्तानला ही लीग घेण्याची गरज नव्हती.
पाकिस्तान टी-20 लीग मुळातच सुरू आहे. ही लीग सुरू करून पाकिस्तानने नवा वाद निर्माण केला आहे. या लीगमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होणार असून त्याचा परिणाम द्विपक्षीय संबंधांसह दोन्ही देशांच्या क्रिकेटवरही होणार आहे. त्यामुळे आता आयसीसी यात लक्ष घालणार का, असा सवाल केला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता, त्याची निवडही करण्यात आली होती. पण त्यानंतर बीसीसीआयने कठोऱ भूमिका घेतल्याने त्याने या लीगमधून माघार घेतली. बीसीसीआयच्या विरोधाचा मोठा परिणाम झाला असून गिब्जपाठोपाठ आता इंग्लंडच्या मॉंटी पनेसरनेही या लीगमधून माघार घेतली आहे.