श्रीनगर – श्रीनगरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि त्यांचे दोन साथीदार ठार झाले आहेत. ठार झालेले दोन साथीदार श्रीनगरातील व्यावसायिक असून ते दहशतवाद्यांनाच सामिल असावेत असा पोलिसांचा कयास आहे. डॉ. मुदासिर गुल आणि अल्ताफ भट अशी त्यांची नावे आहेत. हैदरपुरा भागातील एका व्यापारी संकुलात त्यांची दुकाने आहेत. काल संध्याकाळी ही चकमक झाली.
यातील मुदासिर गुल हा मुळ डेंटिस्ट आहे. तो या संकुलात कॉम्प्युटर सेंटर चालवतो. अल्ताफ भट हा या संकुलाचा मालक आहे आणि त्याची तेथे हार्डवेअर आणि सिमेंटची दुकाने आहेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या चकमकीच्या चौकशीची मागणी केली आहे. भारत सरकारने सामान्य नागरीकांना दहशतवादी ठरवून ठार मारण्याची नवीन निती अवलंबली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
सुरक्षा जवानांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप ठार झालेल्या दोन्ही व्यावसायिकांच्या कुटुंबियांनी केला आहे. या दोन जणांचे मृतदेह अत्यंसंस्कारासाठी ताब्यात देण्याची मागणीही त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. पण कायदा आणि सुव्यवस्था समस्येचे कारण पुढे करून सुरक्षा जवानांनी हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या चारही जणांवर श्रीनगर पासून शंभर किमी अंतरावरील हंडवारा भागात अत्यंसंस्कार करण्यात आले. हे दोन व्यावसायिक दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्यावेळी क्रॉस फायरिंग मध्ये ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.