संजय लीला भन्साळीच्या “गंगूबाई काठियावाडी’ आणि “हिरा मंडी’ बरोबरच “बैजू बावरा’चीही जोरात चर्चा सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे.
काही मोठे कलाकार या सिनेमासाठी निवडले गेले आणि काही मोठ्या कलाकारांनी या सिनेमातून माघारदेखील घेतली आहे.
त्यामुळे या सिनेमातील कलाकारांची अंतिम यादी अजून अनिश्चितच आहे. सर्वात अलीकडे रणबीर कपूरचे नाव या सिनेमाशी जोडले गेले होते. मात्र, आता त्याच्या जागेवर कार्तिक आर्यनची निवड झाली असल्याचे समजते आहे.
“बैजू बावरा’मध्ये आलिया भट, दीपिका पदुकोण, अजय देवगण आदी बड्या कलाकारांची अगोदरच निवड झाली आहे. रणबीर कपूरला संजय लीला भन्साळीबरोबर आपले ट्युनिंग व्यवस्थित जुळेल की नाही याबद्दल शंका वाटत होती.
त्याने आतापर्यंत संजय लीला भन्साळीबरोबर फार काम केलेले नाही. “सांवरिया’मध्ये भन्साळींबरोबर काम करण्याचा अनुभव त्याच्यासाठी फारसा चांगला नव्हता.
म्हणूनच दोघांनी त्यानंतर परत एकत्र काम केलेले नाही. याशिवाय त्याच्याकडे एकापेक्षा जास्त सिनेमे असल्याने त्यानेच हा सिनेमा सोडून दिला असल्याचे समजते आहे.